ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तीर्थक्षेत्र शिर्डी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तीर्थक्षेत्र शिर्डी

शहर : मुंबई

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे थोर संत श्री साईबाबा अनेक वर्षे राहिले. येथे राहूनच त्यांनी भक्तगणांना भक्तिमार्गाविषयी आपल्या कृतीतून मार्गदर्शन केले. श्रद्धा सबुरी अशी दोन सुत्रे जगण्यासाठी देणार्या श्री साईबाबांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला शिर्डी येथे समाधी घेतली. पुढील काळात येथे प्रशस्त मंदिर बांधण्यात आले श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली.१९२२ साली हे मंदिर बांधले आहे. गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या वाढते आहे. शिर्डी संस्थानात भाविकांसाठी निवास, भोजन, प्रसाद अशा सोयी केल्या आहेत. उत्कृष्ट व्यवस्था होण्यासाठी अनेक इमारती बांधल्या आहेत.

इटालीयन संगमरवरातील श्री साईबाबांची सुंदर, विशाल मूर्ती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच संगमरवरातील समाधीस्थानही अतिशय पवित्र, देखणे आहे. नागपूरच्या गोपाळराव बुटींनी मुरलीधराच्या मंदिरासाठी शिर्डीत बांधकाम करून घेतले. परंतु साईबाबाच तेथील मुरलीधर झाले असे म्हटले जाते.

शिर्डीमध्ये बालयोग्याच्या रूपात पोहोचलेले साईबाबा जेथे राहत, त्याला द्वारकामाई म्हणतात.ते ज्या कडुनिंबाच्या झाडाखाली प्रथम दिसले त्याला गुरुस्थान असे नाव आहे. ज्या ठिकाणी ते झोपत, त्या स्थानाला चावडी म्हटले जाते. श्री साईबाबांनी दररोज पाणी घालून तयार केलेली बाग लेंडीबाग म्हणून जतन केली आहे. तिथे कडूनिंबाच्या झाडाखाली बाबा रोज विश्रांती घेत असत. मंदिराच्या परिसरातच श्री साईबाबा ज्यावर नेहमी बसत, ती शिळाही दर्शनासाठी ठेवलेली आहे.

श्रीसाईबाबा ज्या वस्तू दररोज वापरत, त्या व्यवस्थित ठेवून एक संग्रहालय केले आहे. साईबाबांचा पाण्याचा डबा, पादूका, जाते, हुक्कादाणी, कफनी, खडावा या वस्तू पाहण्यास मिळतात. त्यांचे दुर्मीळ फोटोही इथे पाहायला मिळतात.

मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. मनमाड जंक्शनपासून फक्त ६० कि. मी. वर शिर्डी आहे. त्यामुळे रेल्वेने येथे सहज पोहोचता येते. जगभरातून लाखो लोक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात.

मागे

तीर्थक्षेत्र आळंदी
तीर्थक्षेत्र आळंदी

संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवा....

अधिक वाचा

पुढे  

श्री महालक्ष्मीदेवी - कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी - कोल्हापूर

एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि दे....

Read more