By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 08:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात कोरोनाबाधितांची संख्या ३४५ वर पोहोचली आहे. शनिवारी नवे ८५ रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत २३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कोराेनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रविवारी देशभर “जनता कर्फ्यू’ लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. किराणा, आैषधी दुकाने व भाजीपालाची दुकाने सुरू राहणार आहेत. बहुतेक राज्यांनी रविवारी शटडाऊनची घोषणा केली असून यादरम्यान वाहतुकीची साधने बंद राहतील. मात्र, अगाेदरच निघालेल्या रेल्वे चालू राहतील. देशात एकूण ३७०० रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. गो-एअरने देशांतर्गत उड्डाणे बंद करण्याची घोषणा केली आहे. इंडिगोची ६०% विमानेच चालू राहतील. एअर विस्तारानेही काही उड्डाणे कमी केली आहेत.
देशात दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही जय्यत तयारी केली असून मंत्रालयाने शनिवारी देशभर एक हजार ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून क्रिटिकल केअर मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले. राजस्थान व छत्तीसगड राज्यात ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
आज सायं. ५ वाजता टाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त करा... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे की, कोरोनाच्या दहशतीतही आवश्यक सेवेत असलेल्या लोकांचे आभार माना, आपल्या दारात ५ मिनिटे टाळ्या, थाळी, घंटानाद करा. प्रशासनानेही या वेळी सायरन वाजवावा.
जनता कर्फ्यूमध्ये काय करावे?
1. आज आणि येत्या काही आठवड्यांत घराबाहेर पडू नका. इतर लोकांशी संपर्कात येणे टाळा. बाहेरील व्यक्तीस घरी बोलावू नका.
2. जेवढे शक्य आहे तेवढे घरातूनच काम करा. रुग्णालय, पाेलिस, अग्निशामक अशा अत्यावश्यक सेवेत असाल तर घरातील लोकांना भेटण्यापूर्वी स्वत:ला सॅनिटाइझ करा.
3. १० वर्षांखालील मुले आणि ६० वर्षांवरील वयस्करांनी काही आठवडे तरी घराबाहेर पडण्याचे कटाक्षाने टाळावे.
काय करू नये?
1. अत्यावश्यक सेवा, विशेषत: रुग्णालयांवर दबाव टाकू नका. डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना ताण यायला नको. गरज पडलीच तर डॉक्टरांचा फोनवरच सल्ला घ्या.
2. घर किंवा सरकारी तसेच खासगी कार्यालयात काम करणाऱ्या लोकांनाही सोशल डिस्टन्सिंग शिकवावे. हे लोक कामावर येऊ शकत नसतील पगार कापू नका.
3. अफवांपासून दूर राहा. सोशल मीडियावरील तथ्यांश पडताळूनच फॉरवर्ड करा.
भारत संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे : तज्ज्ञांचा दावा
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के.के अग्रवाल यांच्यानुसार भारतातील संसर्ग तिसऱ्या टप्प्प्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता परिस्थिती सुधारली नाही तर स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. > स्टेज-1: कोरोनाने बाधित असलेला कोणताही रुग्ण, मात्र तो परदेशात संक्रमित झाला आहे. > स्टेज-2: कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याचेे कुटुंंबीय व मित्रांना लागण होणे. म्हणजेच आजाराचा स्रोत माहीत असणे. > स्टेज-3: रुग्णाला आजार झालेला असला तरी तो कुणाच्या संपर्कात आल्यामुळे झाला आहे, हेच माहीत नसणे. भारत आता या उंबरठ्यावर आहे. > स्टेज 4: मोठ्या संख्येने संसर्गाच्या फैलावानंतर परिस्थिती सरकारी नियंत्रणातून बाहेर जाते. रेकाॅर्ड मेंटेन करता येत नाही. कुठे किती रुग्ण आहेत, कुठे उपचार सुरू आहेत हेही कळत नाही. खासगी क्षेत्रावरील अवलंबित्व वाढून जाते.
संशयित कोरोनाग्रस्तासाठी अख्खी रेल्वेच आयसोलेट
जोधपूर - हावडा सुपरफास्ट रेल्वेत कोरोनाचा संशयित रुग्ण असल्याच्या माहितीनंतर जोधपूरमध्ये प्लॅटफॉर्म रिक्त करून फुटब्रीज सील करण्यात आले. रेल्वे येताच गाडी वेगळ्या ठिकाणी लावण्यात आली. प्रत्येक प्रवाशाचे थर्मला स्क्रीनिंग झाले. सुदैवाने कुणीही संशयित सापडला नाही.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७ हजार लोकांचा शोध सुरूच : केंद्र सरकारचा दावा...
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रुग्णांच्या संपर्कात आल्याचा संशय असलेल्या ७ हजार लोकांना शोधण्यासाठी विविध संस्था झटत आहेत. तपासाची पद्धतही बदलली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संसर्गाच्या ५ व्या ते १४ व्या दिवसात संपर्कात आलेल्या सर्व संशयितांची तपासणी केली जाईल.
जग -: २ दिवसांपासून हजारापेक्षा जास्त लोक मरण पावत आहेत
> १४ मार्चला ४०४ बळी गेले. ते तोपर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू होते. २० मार्चला १,३५६ मृत्यू झाले. १९ मार्चला १,०८० रुग्णांचा बळी गेला होता. हा आकडा आता वेगाने वाढत आहे.
> १८६ देशांत संसर्ग पसरला आहे. आता फक्त १० देशच कोरोनाच्या तडाख्यापासून वाचलेले आहेत. चीन सोडून सर्व मोठ्या देशांत बळींचा आकडा १० पट वेगाने वाढत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ ....
अधिक वाचा